चार हजार ८५४ जागांसाठी १५ हजारपेक्षा अधिक अर्ज ; सर्वांना शिक्षण हक्क अंतर्गत प्रवेश प्रक्रिया

जिल्ह्यातील ४०१ शाळांमध्ये २५ टक्के अंतर्गत राखीव असलेल्या चार हजार ८५४ जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

नाशिक – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध मिळण्यासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. या वर्षी जिल्ह्यातील ४०१ शाळांमध्ये २५ टक्के अंतर्गत राखीव असलेल्या चार हजार ८५४ जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. आतापर्यंत या जागांसाठी १५ हजार ६९२ अर्ज आले आहेत.

हे वाचले का?  कोकणात माकडांचा उपद्रव वाढला; ३५ लाख खर्च करुन वन विभाग माकडे पकडण्याची मोहीम हाती घेणार

२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के राखीव जागांवर त प्रवेश प्रक्रिया एक मार्चपासून सुरू झाली असून, १७ मार्चपर्यंत पालकांना आरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पालकांना निवासाचा पुरावा, पाल्याचा जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, अपंग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. सरकारी लाभांच्या योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक रखडल्याची चर्चा होती. अखेर वेळापत्रक जाहीर होऊन एक मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. १७ मार्च ही अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मार्चअखेर प्रवेशासाठी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया एप्रिल, मे महिन्यात होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे नाशिक जिल्ह्यातील ४०१ शाळांमधील चार हजार ८५४ जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जाणार असून यंदा पालकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत १५ हजार ६९२ अर्ज भरण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.