देशभरातच थंडीचा कडाका वाढला; उत्तरेकडील राज्यांना थंडीचा ‘रेड’ व ‘ऑरेंज’ अलर्ट

उत्तरेकडील थंड वारे आता महाराष्ट्राच्या दिशेने वळले आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे.

नागपूर : उत्तरेकडील थंड वारे आता महाराष्ट्राच्या दिशेने वळले आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा दहा अंशापेक्षाही कमी आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान खात्याने काही राज्यांमध्ये पावसाचा नाही तर चक्क थंडी आणि धुक्याचा ‘ऑरेंज’ व ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे.

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे आणि किमान तापमान नऊ ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची आणि परिणामी गारठा वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भात मंगळवारपर्यंत उन्हाची चाहूल जाणवू लागली असतानाच आता बुधवारपासून पुन्हा आभाळी वातावरण आहे. तर बोचरे आणि गार वारे जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्येही किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे या राज्यांसह देशातील अनेक भागांत आता थंडीचा जोर वाढला आहे. पुढील काही दिवसही थंडीची लाट कायम राहणार असून भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांना पावसाचा नाही तर थंडी आणि धुक्यांचा ‘ऑरेंज’ व ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. दरम्यान वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील हवामानात येत्या काही दिवसांत बदलदेखील पाहायला मिळू शकतात, मध्यप्रदेशातदेखील किमान तापमानाचा पारा मंगळवारी ३.६ अंश सेल्सिअसवर पोहोचला. अनेक ठिकाणी ते चार ते पाच अंश सेल्सिअससुद्धा नोंदवण्यात आले. या राज्यातसुद्धा धुक्यांमुळे दृष्यमानता कमी झाली आहे.

हे वाचले का?  अन्यथा ‘लाडकी बहीण’ रद्द करू! सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा

उत्तर भारतात थंडीचा सर्वाधिक कडाका असून दाट धुक्यांचे प्रमाण वाढत आहे. किमान पाच दिवस तरी यातून दिलासा नाही. कडाक्याची थंडी आणि धुके याचा प्रतिकूल परिणाम शेतीवरसुद्धा पडला आहे. दाट धुक्यांचा वाहतुकीवरदेखील मोठा परिणाम झाला आहे. दृष्यमानता कमी झाल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. केवळ रस्त्यावरील वाहतूकच नाही तर रेल्वे आणि विमान वाहतुकीवरसुद्धा त्याचा परिणाम झाला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना वाहने जपून चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या असून काही उशिराने धावत आहे. विमान वाहतुकीच्या बाबतीतही हीच स्थिती आहे.

हे वाचले का?  भारतात अनेक सिंगापूर निर्माण करण्याचा ध्यास; दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन