धक्कादायक! हवा प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुष्य तब्बल पाच वर्षांनी झाले कमी; अहवालातून समोर आली माहिती

या अहवालात सांगितल्याप्रमाणे हवा प्रदूषणाच्या समस्येचा दक्षिण आशियातील लोकांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम झाला आहे. हवा प्रदूषणामुळे त्यांचे आयुष्य ५.१ वर्षांनी कमी झाले आहे. त्यामध्ये बांगलादेश, भारत, नेपाळ व पाकिस्तानसारख्या देशांतील लोकांचा समावेश आहे.

Poor Air Quality : जगभरात हवा प्रदूषणाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालात सांगितल्याप्रमाणे हवा प्रदूषणाच्या समस्येचा दक्षिण आशियातील लोकांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम झाला आहे. हवा प्रदूषणामुळे त्यांचे आयुष्य ५.१ वर्षांनी कमी झाले आहे. त्यामध्ये बांगलादेश, भारत, नेपाळ व पाकिस्तानसारख्या देशांतील लोकांचा समावेश आहे.

‘एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स’ (AQLI) २०२३ नुसार शिकागो विद्यापीठाच्या ‘एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट’ने २९ ऑगस्ट रोजी हा अहवाल सादर केला होता. या अहवालात प्रदूषणामुळे लोकांच्या आयुर्मानावर होणाऱ्या परिणामविषयी सांगितले.
तंबाखूच्या सेवनामुळे या देशांतील लोकांचे आयुष्य २.८ वर्षांनी कमी होते. यावरून तुमच्या लक्षात येईल की, हवा प्रदूषणाचा धोका हा तंबाखूच्या सेवनापेक्षा जास्त आहे.

हे वाचले का?  Modi In Mumbai: रशिया-ऑस्ट्रिया दौऱ्यानंतर मोदी आज मुंबईत; २९ हजार कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन; वाचा यादी!

हवा प्रदूषणाचा सर्वांत जास्त धोका असणाऱ्या दक्षिण आशियाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. उदा. हवा प्रदूषणामुळे व्यक्तीचे सरासरी आयुष्य ५.३ वर्षांनी कमी होत आहे. त्याशिवाय या समस्येमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा धोका वाढला आहे. आरोग्य समस्यांमुळे भारतीयांचे आयुष्य जवळपास ४.५ वर्षांनी कमी होत आहे.

या अहवालातून समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जर प्रदूषणाची पातळी २००० वर असती, तर देशातील लोकांचे आयुर्मान हे फक्त ३.३ वर्षांनी कमी झाले असते; पण गेल्या काही वर्षांमध्ये प्रदूषणाच्या पातळीत अतिप्रमाणात वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

हे वाचले का?  टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

जागतिक स्तरावर भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत जास्त प्रदूषित देश आहे आणि प्रदूषणासारख्या गंभीर समस्येचा सामना करीत आहे. भारतातील १.३ अब्ज लोकसंख्या अशा भागात राहते जिथे प्रदूषणाची पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त आहे. भारतातील ६७.४% लोकसंख्या भारताच्या नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सपेक्षा जास्त असलेल्या भागात राहते.

औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या इत्यादी कारणांमुळे प्रदूषणामध्ये वाढ दिसून येत आहे. इंधनाच्या (fossil fuel) अतिवापरामुळे प्रदूषणावर थेट परिणाम दिसून येत आहे. भारत आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्ये २००० या वर्षापासून वाहनांची संख्या चौपट झाली आहे; तर बांगलादेशमध्ये २०१० ते २०२० दरम्यान वाहनांच्या संख्या तिपटीने वाढली आहे.
हवा प्रदूषणाचा परिणाम भारताच्या उत्तरेकडील भागांवर सर्वांत जास्त दिसून आला आहे. येथील लोकसंख्या ही खूप जास्त आहे. देशाची राजधानी दिल्ली हे याचे उत्तम उदाहरण आहे. वारंवार दिल्लीच्या हवा प्रदूषणाच्या बातम्या आपण वाचत असतो.

हे वाचले का?  Wayanad landslides Neethu Jojo: भूस्खलनाची पहिली माहिती देणारी ‘ती’ वाचू शकली नाही; वायनाडमध्ये त्या रात्री काय झालं?

हवा प्रदूषणासारख्या समस्येचा सामना करण्यासाठी सरकार, उद्योग आणि वैयक्तिकरीत्या प्रत्येकाने सहयोग करणे गरजेचे आहे. सार्वजानिक वाहनांचा वापर, हवा प्रदूषणविरोधात जनजागृती करणे, इत्यादी गोष्टींमुळे ही समस्या सोडविणे सोपे जाईल.
प्रदूषणाविरोधात उचललेले हे पाऊल केवळ पर्यावरणाला वाचवण्यासाठी नाही तर मानवी जीवनसुद्धा सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकते.