पुरवठा विभागाचे कार्यालय अपंगांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर

नाशिक जिल्हा पुरवठा विभागाकडूून नव्या शिधापत्रिका मिळण्यास सहा ते १२ महिन्यांचा कालावधी लागतो.

नाशिक – जिल्हा पुरवठा विभागाकडूून नव्या शिधापत्रिका मिळण्यास सहा ते १२ महिन्यांचा कालावधी लागतो. या विभागाचे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर असल्याने तिथे पोहचणे अवघड होत असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अपंग बांधवांनी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अपंग बांधवांशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा हे कार्यालयातून खाली उतरले. त्यांचे निवेदन स्वीकारले.

दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्था आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्या नेतृत्वाखाली अपंग बांधवांनी पुरवठा विभागाशी संबंधित समस्या मांडल्या. काही दिवसांपूर्वीच नाशिकरोड येथील धान्य पुरवठा विभागाचे कार्यालय शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांतरीत करण्यात आले. नव्या जागेतील हे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर आहे. जिल्ह्यातील सर्व अपंग बांधव, ज्येष्ठ नागरिक हे शरीराने समस्याग्रस्त असतात. ज्येष्ठांना वयोमानाने शरीर साथ देत नाही. तिसऱ्या मजल्यावरील पुरवठा विभागाच्या कार्यालयात ये-जा करण्यासाठी उद्वावाहनाची व्यवस्था नसल्याने पायऱ्या चढून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे अपंग व ज्येष्ठांना या कार्यालयात पोहोचणे जिकिरीचे झाले असून हे कार्यालय तळमजल्यावर स्थलांतरीत करण्याची मागणी संबंधितांनी केली. तळ मजल्यावर कार्यालय असल्यास अपंग बांधव शिधापत्रिकेसह इतर कामे करू शकतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

हे वाचले का?  नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

यावेळी शिधापत्रिकेशी संबंधित समस्या मांडल्या गेल्या. अपंग बांधवांना शिधापत्रिका मिळत नाहीत. या पत्रिकेचा १२ अंकी क्रमांक उपलब्ध होत नाही. शिधापत्रिकेसाठी सहा महिने, वर्षभर प्रतीक्षा करावी लागते. शिधापत्रिकेच्या कामात दलाल वरचढ ठरत आहेत. पुरवठा विभागातील कर्मचारी अपंगांना सहकार्य करत नाहीत. या विभागात दलालांची कामे चटकन होतात, असा आरोपही अपंग बांधवांनी केला. काही संघटनांनी पुरवठा विभागाचे कार्यालय पुन्हा नाशिकरोडला स्थलांतरीत करण्याची मागणी केली. उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी अपंग बांधवांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा आग्रह धरला. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. वरच्या मजल्यावरील जिल्हाधिकारी कार्यालय देखील तळमजल्यावर आणण्याची मागणी दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे दीपक शेवाळे, कैलास चव्हाण, मच्छिंद्र चव्हाण आदींनी केली.

हे वाचले का?  Nashik Crime : नाशिकमध्ये दुचाकीवर बसलेल्या तरुणाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

कर्णबधिरांविषयक चित्रफितीस विरोध

समाजमाध्यमात कथित ध्वनिचित्रफितीतून जाणीवपूर्वक कर्णबधिर व महिलांचा अपमान केला गेला असून ही वादग्रस्त चित्रफित त्वरित हटवावी आणि संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. समाजमाध्यमातील संबंधित चित्रफितीमुळे कर्णबधिर बांधव संतप्त झाले आहेत. चित्रफितीत मूकबधिर व अपंग बांधवांविषयी अयोग्य भाषा वापरण्यात आली आहे. हे कृत्य कर्णबधिर समाजाचा आणि महिलाचा अनादर करणारे आहे. समाज माध्यमातील संबंधित चित्रफित काढून टाकावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.