‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ विरोधात मालेगावकर आंदोलनाच्या पवित्र्यात

महावितरण कंपनीतर्फे मालेगावात लवकरच ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ बसविण्यात येणार आहेत.

लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव : महावितरण कंपनीतर्फे मालेगावात लवकरच ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ बसविण्यात येणार आहेत. या मीटरमुळे शहरवासीयांच्या अडचणी वाढणार असल्याने त्या विरोधात सूर उमटताना दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून येथील एटीटी हायस्कूलमध्ये व्यापारी, सामाजिक व राजकीय संघटना कार्यकर्त्यांच्या पार पडलेल्या बैठकीत प्रीपेड स्मार्ट मीटरविरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.

महावितरणने कंपनीने चार खासगी कंपन्यांना ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ बसविण्याचे कंत्राट दिले असून त्यात मालेगावचाही समावेश आहे. या मीटरचा वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्याच्या प्रचलीत पध्दतीनुसार वीज वापरानंतर देयके भरताना मध्यमवर्गीय तसेच कामगार वर्गाला कसरत करावी लागत असते. असे असताना प्रीपेड स्मार्ट मीटर बसविल्यावर मीटरची किंमत आणि आगाऊ देयक कसे भरणार, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. मालेगाव हे झोपडपट्ट्यांचे शहर आहे. येथील यंत्रमाग व्यवसाय नेहमीच मंदीच्या सावटाखाली असतो. शहरातील बहुसंख्य लोक दारिद्र्यरेषेखालील आहेत. करोना संकटानंतर बाजारपेठेची घडी विस्कटल्याने व्यापारी वर्ग हवालदिल झाला आहे. अशा स्थितीत वीज देयकांचा हा अतिरिक्त भार सहन करणे अवघड असल्याने त्याला विरोध करण्याचा सूर बैठकीत लावण्यात आला.

हे वाचले का?  नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

बैठकीस रामदास बोरसे, जमील क्रांती, निखिल पवार, देवा पाटील, सोहेल डालरीया, ओम गागरणी, साजिद अन्सारी, विवेक वारुळे, जयप्रकाश पठाडे, गजानन येवले, प्रवीण चौधरी, सुशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

लढ्यात सर्वांचा सहभाग घेणार

मालेगावच्या पश्चिम भागात याविषयीच्या बैठका यापूर्वी पार पडल्या होत्या. आता पूर्व भागातही बैठक घेण्यात आली असून राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच हा लढा उभारण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. तसेच विविध सामाजिक, राजकीय, यंत्रमाग व व्यापारी संघटनांना या लढ्यात सहभागी करुन घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा

जिल्ह्यात ११ लाख स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम

आगाऊ रक्कम भरून अर्थात प्रीपेड स्वरुपातील स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या मोहिमेत जिल्ह्यात सुमारे ११ लाख ग्राहकांसाठी हे मीटर बसविले जाणार आहे. थकबाकी वसुलीसाठी वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात मोठी कसरत करावी लागते. नव्या मीटरमुळे या कामातून त्यांची पूर्णपणे मुक्तता होईल. तांत्रिक कामांवर ते अधिक लक्ष देऊ शकतील, याकडे लक्ष वेधले जात आहे. स्मार्ट मीटर बसविल्यावर ग्राहक भ्रमणध्वनीप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील. विजेसाठी किती खर्च करायचे, हे त्यांना निश्चित करता येईल. किती वीज वापरली, याची माहिती ग्राहकाला नियमितपणे भ्रमणध्वनीवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशांपैकी किती पैसे शिल्लक आहेत, आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा, हे ग्राहकांना समजणार आहे. नव्या स्मार्ट मीटरसाठी ग्राहकांना कुठलीही रक्कम मोजावी लागणार नाही. त्यांना ते मोफत मिळणार असल्याचे महावितरणकडून सांगितले जाते.