बाजार समिती निवडणुकीत दिग्गज रिंगणात, अखेरच्या दिवशी अर्ज सादर करणाऱ्यांची गर्दी

बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वच बाजार समित्यांमध्ये इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे.

नाशिक: जिल्ह्यातील १४ कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरच्या दिवशी सोमवारी इच्छुकांची एकच गर्दी झाली. सर्वत्र दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. नाशिक बाजार समितीसाठी अखेरच्या दिवसापर्यंत सहकारी संस्था गटात १०८, ग्रामपंचायत ४६, व्यापारी १८, हमाल गटातून तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले. हमाल गटात एकाच उमेदवाराचे तीन अर्ज दाखल झाले असून छाननीत हा अर्ज वैध ठरल्यास संबंधिताची बिनविरोध निवड निश्चित आहे. ग्रामीण भागातील राजकारणाची व सत्ताकारणाची आगामी दिशा निश्चित करणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वच बाजार समित्यांमध्ये इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे.

हे वाचले का?  त्र्यंबकेश्वर मंदिरातील विशेष दर्शन व्यवस्था श्रावणात बंद

बऱ्याच काळापासून रखडलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीला मुहूर्त लागल्यानंतर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस होता. त्यामुळे इच्छुकांची मुदतीत अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू होती. यात नाशिकसह मालेगाव, मनमाड, येवला, नांदगाव, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, चांदवड, कळवण, दिंडोरी, घोटी, सुरगाणा व देवळा या बाजार समित्यांचा समावेश आहे. काहींनी समर्थकांसह दाखल होत शक्ती प्रदर्शन केले. स्थानिक राजकारणात आपले वर्चस्व राखण्यासाठी बाजार समिती महत्वाची मानली जाते. तिच्याद्वारे शेतकऱ्यांच्या संपर्कात राहता येते. त्यामुळे राजकीय पक्षांचे बडे नेत्यांनी ही निवडणूक गांभिर्याने घेतली आहे. नाशिक बाजार समितीत पुन्हा पिंगळे आणि चुंभळे या दोन परंपरागत प्रतिस्पर्धांमध्ये लढत रंगणार आहे. उभयतांनी आपले अर्ज आधीच दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सहकारी संस्था गटात १०८, ग्रामपंचायत ४६, व्यापारी १८ व हमाल गटातून तीन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी सांगितले.

हे वाचले का?  मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सव परंपरा खंडित, रेल्वे प्रशासनाचा असहकार

बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी भक्कम पॅनल तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी अखेरच्या दिवसापर्यंत १८ जागांसाठी एकूण १५० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सोसायटी गटाच्या ११ जागांसाठी ८८, ग्रामपंचायत गटाच्या चार जागांसाठी ३४, व्यापारी गटाच्या २ जागांसाठी १९ तर हमाल मापारी गटाच्या एका जागेसाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत. त्यात बहुसंख्य माजी सभापती व संचालकांचा समावेश आहे. सर्वत्र अनेक मातब्बरांनी अर्ज दाखल केल्याने मोठी चूरस दिसून येणार आहे.

हे वाचले का?  निवडणुकीसाठी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण