“बाळासाहेबांना गुरु म्हणता याचं आश्चर्य वाटतं,” संजय राऊतांची बंडखोर आमदारांवर टीका; म्हणाले “आज बाळासाहेब असते तर…”

शिवसेना सोडून गेलेले बाळासाहेब आमचे गुरु असल्याचं सांगत आहेत याचं आश्चर्य वाटतं, संजय राऊतांची टीका

बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरु असल्याचं सांगत आहेत याचं आश्चर्य वाटतं. जर बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं असं सांगत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

“बाळासाहेब आमच्या सर्वांचे गुरु होते. ज्यांची शिवसेनेवर, महाराष्ट्रावर, देशावर अढळ निष्ठा आहे त्या सर्वांसाठी बाळासाहेब गुरु होते. त्यांनी आम्हाला दिशा दिली, मार्गदर्शन केलं. गुरु मोकळ्या हाताने देत असतो, तसंच बाळासाहेबांनी मोकळ्या हाताने, मनाने उधळण केली. असा गुरु होणे नाही. ते एका अर्थाने महाराष्ट्राचे आणि देशाचेही गुरु होते. प्रत्येक दिवशी आमच्या गुरुचं स्मरण होत असतं. आजच्या दिवशी विशेष होत आहे, कारण काही लोक शिवसेनेच्या बाहेर जाऊन बाळासाहेब गुरु आहेत सांगत आहेत. बाळासाहेब हयात असते तर त्यांनी त्यावर काय भाष्य केलं असतं हे समजून घेणं गरजेचं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारनं थांबवला, नवे अर्जही स्वीकारणं बंद; नेमकं कारण काय?

“बाळासाहेब आमच्यासाठी तेजस्वी नेते होते. गुरुमध्ये तेज असलं पाहिजे; जे आपले भक्त, शिष्य, समर्थकांना दिशा देईल. ते सर्व बाळासाहेबांमध्ये होतं. आमच्यासारखे लाखो शिवसैनिक त्यांना गुरु मानत होते. राज्य आणि देशातील लोकांनीही त्यांना गुरुस्थानी ठेवलं होतं. निष्ठेच्या बंधनाने बाळासाहेबांनी सर्वांना एकत्र ठेवलं होतं,” असं संजय राऊत म्हणाले. “बाळासाहेबांनी आम्हा सर्वांवर फार उपकार केले असून आम्ही नेहमी त्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेले असू,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

हे वाचले का?  माजी आमदार राजन तेली यांचा भाजपा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

राज्यपालांना दिलेलं पत्र रडीचा डाव असल्याची टीका दीपक केसरकरांनी केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “पक्षाने यावर आधीच उत्तर दिलं आहे. ही कायदेशीर लढाई आहे. मग तुम्ही कोर्टात का गेलात? कोर्टाने काय निर्णय दिला हे राज्यपालांना कळवणं आमचं कर्तव्य आहे”.

एकनाथ शिंदेंचं गुरूपौर्णिमेला बाळासाहेबांना विनम्र अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट केलं असून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपण त्यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्याचं सांगितलं आहे. तसंच बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच असं सांगत अप्रत्यक्षपणे आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे.

हे वाचले का?  Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ, महायुतीपुढची नेमकी आव्हानं काय?

एकनाथ शिंदे यांनी ट्विटरला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो असून बाजूला “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन,” असं लिहिण्यात आलं आहे.