“भाजपावर आरोप करतोय व काही प्रकरणं उकरून काढतोय, हेच दाखवण्यासाठी खडसेंची धडपड”

राज्यातील सर्व बँका, पतसंस्था ज्यांचे ज्यांचे घोटाळे आहेत, त्यांची एकादाच काय ते सर्व चौकशी लावा, असं देखील म्हणाले.

“मला वाटतं खडसेंना सध्या कामही नाही आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर आपण भाजपवर आरोप करतोय आणि काही प्रकरणे उकरून काढतोय, हेच दाखवण्यासाठी एकनाथ खडसे धडपड करत आहेत!” असं म्हणत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या नऊ राज्यात शाखा असून ११०० कोटींची मालमत्ता मातीमोल भावात विकली गेल्याचा दावा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

या संदर्भात ट्विटरवर एका व्हिडिओद्वारे दरेकर यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, “जी गोष्ट चौकशीत आहे त्यावर निष्कर्ष येईल. मला खडसेंना विचारायचं आहे, राज्य सरकारी बँकेने कारखाने जे लिलावात काढले आहेत, ५०० कोटींचे कारखाने १० ते १५ कोटींना विकले. त्याची चौकशी करा. बुलडाणा अर्बन बँक, वर्धा बँक, नागपूर बँक असेल अख्ख्या बँकाच्या बँका डुबवल्या आहेत. राज्य सरकारी बँकेने त्या ठिकाणी कर्ज दिलं आहे, जिथं केवळ जागा आहे प्रकल्प देखील नाही. अशा प्रकल्पांना कर्ज दिलं आहे. मला वाटतं राज्यातील सर्व बँका, पतसंस्था कुठल्याही पक्षाच्या असू द्या ज्यांंचे ज्यांचे  घोटाळे आहेत, त्यांची एकादाच काय ते सर्व चौकशी लावा आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर येऊ द्या.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

दरम्यान, सोमवारी भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेबाबत पत्रकार परिषदेत बोलताना खडसे यांनी, २०१८ पासून अ‍ॅड. कीर्ती पाटील यांच्यामार्फत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहोत. या प्रकरणांमध्ये ठेवीदारांना न्याय मिळावा, अशी प्रामाणिक भूमिका घेऊन पाटील यांनी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या असल्याचं सांगितलं.

तसेच,  २०१८-१९ मध्ये राज्याचे तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे देखील वारंवार याप्रकरणी सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी देशमुख यांच्याशी शाब्दिक चकमक उडाल्याचेही खडसे म्हणाले.

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…