महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जातेय, प्रगतीही मंदावलीय; सुप्रिया सुळे यांची भाजप व राज्य सरकारवर टीका

महाराष्ट्राच्या खच्चीकरणासाठी केंद्रातील अदृश्य शक्ती सतत कार्यरत असल्याचा आरोप सुळे यांनी केला.

कराड : महाराष्ट्रात दोनशे आमदारांचे सरकार स्थैर्य देऊ शकत नसून, राज्यात प्रचंड अस्वस्थता आहे. महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात असून, प्रगतीचा वेग मंदावत असल्याची बाब चिंताजनक असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. गृहमंत्र्यांचे काम त्या दर्जाचे दिसत नसल्याचे सांगत सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या ३९ व्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

भाजपवर हल्लाबोल चढवताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, की पूर्वीची भाजप आता राहिली नसून, भ्रष्ट जुमला पार्टी बनली आहे. इन्कमटॅक्स, सीबीआय, ईडीच्या कारवाया केवळ महाराष्ट्रातच कशा होतात असा प्रश्न करून, महाराष्ट्राच्या खच्चीकरणासाठी केंद्रातील अदृश्य शक्ती सतत कार्यरत असल्याचा आरोप सुळे यांनी केला. मराठा आरक्षणावरून भुजबळ यांची वक्तव्य समाजात दंगली घडवणाऱ्या आहेत का? असे विचारले असता, हो तसेच दिसतंय असे सांगत मराठा, लिंगायत, धनगर आणि मुस्लिम समाजाची आरक्षणाची मागणी आहे . परंतु , त्याबाबत सरकार गंभीर नसल्याची टीकाही खासदार सुळे यांनी केली.