राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार – उदय सामंत

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत

रत्नागिरी :   मराठी भाषा जगाच्या पाठीवर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात रत्नागिरी पंचायत समितीचा शिक्षण विभाग, कोकण मराठी साहित्य परिषदेची (कोमसाप) मालगुंड शाखा आणि कवी केशवसुत स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हे वाचले का?  अतिवृष्टीमुळे रायगडला पुराचा तडाखा; महाड, रोहा, पाली, नागोठणे येथे पूरस्थिती

सामंत म्हणाले की, मराठी भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला अधिक चांगले दिवस आणण्यासाठी आपण सर्वानी या भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. ही भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी, तसेच जगाच्या पाठीवर पोचवण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात करण्यात येईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असून ते त्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असाही विश्वासमंत्री सामंत यांनी व्यक्त केला.

हे वाचले का?  ”शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले”; मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, ”त्यांना जमलं नाही म्हणून…”

कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

या वेळी खासदार विनायक राऊत, कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, अरुण नेरुरकर, नमिता कीर, साधना साळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी सकाळी मालगुंड ग्रामपंचायत ते कवी केशवसुत स्मारकापर्यंत ग्रंथिदडी काढण्यात आली. आकर्षक पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थ या दिंडीत सहभागी झाले.