राज्यातील ‘या’ प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले, आता ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ म्हणून ओळखले जाणार

नामांतराबाबतचा शासन आदेश जलसंपदा विभागाने जारी केला आहे. यामुळे अकोले तालुक्यातील जनतेची अनेक दिवसांची मागणी मान्य झाली आहे.

नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाची भाग्यरेखा असणारे आणि अभिजात निसर्ग सौन्दर्याचे कोंदण लाभलेले अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण आता “आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” म्हणून ओळखले जाणार आहे. राज्य सरकारने या धरणाचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला असून नामांतराबाबतचा शासन आदेश जलसंपदा विभागाने जारी केला आहे. यामुळे अकोले तालुक्यातील जनतेची अनेक दिवसांची मागणी मान्य झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवर भंडारदरा येथे ब्रिटिश राजवटीत १९१० मध्ये धरण बांधण्यास सुरवात झाली. १९२६ मध्ये धरणाचे बंधकाम पूर्ण झाले. १०डिसेंबर १९२६ रोजी या धरणाचे लोकार्पण तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लेसस्ली विल्सन यांच्या हस्ते करण्यात आले.या भंडारदरा धरणाला तत्कालीन ब्रिटिश सरकारने ‘विल्सन डॅम’ तर त्या मागच्या जलाशयाला ‘ लेक आर्थर हिल’ असे नाव दिले होते. आर्थर हिल हे तेव्हाचे मुख्य अभियंता होते

हे वाचले का?  Manoj Jarange : “बेगडी उपोषण करण्यापेक्षा…”, आंदोलन स्थगित करताना मनोज जरांगे असं का म्हणाले?

स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश कालीन अनेक वास्तूंची, स्थानांची नावे बदलली गेली. मात्र भंडारदरा धरणाची कागदोपत्री नावे पूर्वीचीच कायम होती. भंडारदरा धरणाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव द्यावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात होती.

राघोजी भांगरे या आदिवासी क्रांतीकारकाने इंग्रज राजवटी विरुद्ध केलेला उठाव आणि जुलमी सावकार शाही विरुद्ध दिलेला लढा हे अकोले तालुक्याच्या गौरवशाली इतिहासातील सोनेरी पान आहे. तालुक्यातील देवगाव येथे जन्मलेल्या राघोजींना संघर्षाचा वारसा आपल्या पित्याकडून मिळाला होता. तरुण वयातच परिसरातील आदिवासी तरुणांना संघटित करून त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. इंग्रजांना त्याने सळो की पळो करून सोडले होते. तत्कालीन इंग्रज सरकारने राघोजीना पकडण्यासाठी चार हजार रुपयांचे इनाम लावले होते. यावरून त्यांच्या बंडाची तीव्रता लक्षात येते. सावकार शाहीविरुद्धच्या लढ्यात त्यांनी नगर, नाशिक, ठाणे, पुणे जिल्ह्यातील जुलमी सावकारांविरुद्ध छापे टाकून त्यांच्याकडील गहाणखते जाळून टाकली.

हे वाचले का?  अतिवृष्टीमुळे रायगडला पुराचा तडाखा; महाड, रोहा, पाली, नागोठणे येथे पूरस्थिती

राघोजीना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले.अखेर जानेवारी १९४८ मध्ये पंढरपूर मध्ये राघोजीला पकडण्यात इंग्रजांना यश आले. त्यांच्या विरुद्ध एकतर्फी खटला चालविण्यात येऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २ मे १८४८ रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात राघोजी याना फाशी देण्यात आली. ठाणे कारागृहात राघोजी भांगरे यांचे स्मारक असून कारागृहासमोरील चौकाला राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात आले आहे. भंडारदरा धरणाला राघोजी भांगरे यांचे नाव द्यावे अशी मागणी तालुक्यातील अनेक नेते,संस्था संघटना यांनी केली होती.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी या बाबत सरकारकडे पत्रव्यवहार केला होता.ठाणे कारागृहात राघोजीना फाशी देण्यात आली.त्या कारागृहात मंत्री असतांना राघोजीचे स्मारक केले. आज सरकारने धरणाला नाव देण्याचा आपला प्रस्ताव मान्य केला. जीवनात याचा फार मोठा आनंद आपल्याला असल्याचे पिचड म्हणाले.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

भंडारदरा धरणाची पाणी साठवण क्षमता ११ हजार ३९ दशलक्ष घनफुट आहे. धरणाची दगडी भिंत २७० फूट उंच आहे. अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, रहाता तालुक्यातील शेतीला या धरणाचा लाभ होतो. कळसुबाई आणि रतनगडाच्या डोंगर रांगांनी वेढलेला भंडारदरा जलाशयाचा परिसर नितांत सुंदर आहे.दर वर्षी हजारो पर्यटक भंडारदरा परिसराला भेट देत असतात.