रायगडमधील भातशेतीला मिळणार तंत्रज्ञानाची जोड ; ड्रोनच्या मदतीने केली जाणार किटक नाशक फवारणी

दिवसेंदिवस शेतीसाठी कामगार मिळणे कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतीला यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे.

अलिबाग : कोकणातील भातशेतीला आता तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. ड्रोनच्या मदतीने किटक नाशकांची फवारणी करणे आता शक्य होणार आहे. माणगाव येथे पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला असून, यामुळे वेळ आणि श्रम दोघांचीही बचत होणार आहे.
कामगारांची कमतरता ही कोकणातील भात शेतीसमोरील सर्वात मोठी समस्या आहे. दिवसेंदिवस शेतीसाठी कामगार मिळणे कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतीला यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे. हीबाब लक्षात घेऊन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी माणगाव येथील कृषि संशोधन केंद्र रेपोली येथे कोकण विभागातील पाहिली ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

हे वाचले का?  शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा

यावेळी विभागीय कृषि सहसंचालक कोकण विभाग ठाणे अंकुश माने व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उज्वला बाणखेले मॅडम प्रमुख उपस्थित होत्या, यावेळी बायर क्रॉप सायन्स कंपनीचे प्रमुख सुशील देसाई, खांबेटे उपस्थित होते.यावेळी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानचा अवलंब करून तयार केलेले ड्रोनद्वारे फवारणी कशी फायदेशीर आहे, मजुरांवर अवलंबून न राहता ड्रोनद्वारे फवारणीचा पर्याय वापरावा याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी डॉ. नरेंगलकर, किटकशास्र विभाग दापोली यांनी कीटकनाशक फवारणी करताना काय काळजी घ्यावी याबदल मार्गदर्शन केले.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Winter Session LIVE Updates : राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी बिनविरोध निवड

ड्रोन द्वारे फवारणी करताना ५-७ मिनिटा मध्ये एक एकर प्रक्षेत्रावर फवारणी करण्यात आली, तालुक्यांतील ८५ प्रगतशील शेतकरी या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले होते. जिल्ह्यातील इतर भागातही असे प्रयोग घेण्याचा मानस यावेळी कृषी विभागाने बोलून दाखवला आहे.
मजुरांची समस्या लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. हीबाब लक्षात घेऊन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ड्रोन व्दारे अपघ्या १० ते पंधरा मिनटात एक ते दोन एकर शेतीची फवारणी करणे शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रमाची बचत होऊ शकेल.- उज्वला बाणखेले, कृषी अधिक्षक रायगड.