“शिक्षणापेक्षा मुस्लिमांना हिजाब किंवा सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीची चिंता आहे”, अभिनेते नसिरूद्दीन शाह यांचं परखड भाष्य!

नसिरूद्दीन शाह म्हणाले, “मुस्लिमांनी आत्तापर्यंत सर्व चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं. शिक्षणाविषयी चिंता करण्यापेक्षा त्यांना हिजाब…”

अभिनेते नसिरुद्दीन शाह त्यांच्या परखड भाष्यासाठी परिचित आहेत. मग तो विषय चित्रपट समीक्षेचा असो, एखाद्या भूमिकेचा असो किंवा मग सामाजिक मुद्द्यांचा असो. अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरदेखील नसिरुद्दीन शाह यांनी स्पष्ट भूमिका मांडल्या आहेत. कधी त्यावरून वाद निर्माण झाल्याचं दिसलं तर कधी त्यांनी मांडलेल्या भूमिकांना लोकांनी उचलून धरलं. सध्या नसिरुद्दीन शाह यांनी मांडलेल्या अशाच एका भूमिकेची जोरदार चर्चा चालू आहे. सुप्रसिद्ध मुलाखतकार करण थापर यांनी ‘द वायर’साठी त्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत नसिरुद्दीन शाह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं, एनडीए सरकारची धोरणं, देशातील धार्मिक द्वेषाचं राजकारण, सामाजिक समस्या अशा अनेक मुद्द्यांवर नसिरुद्दीन शाह यांनी यावेळी भूमिका मांडली. देशात धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नसिरुद्दीन शाह यांना विचारणा केली असता त्यावर त्यांनी यात देशातील मुस्लिमांचीही चूक असल्याचं मत मांडलं.

हे वाचले का?  अनुसूचित जाती, जमातींतही ‘क्रीमिलेयर’ हवे; घटनापीठातील चार न्यायमूर्तींची महत्त्वाची सूचना

काय म्हणाले नसिरुद्दीन शाह?

नसिरुद्दीन शाह यांनी यावेळी सगळ्या गोष्टींचा दोष मोदींना देणं सोपं असल्याचं सांगितलं. “मोदींना विरोध करणं फार सोपं आहे. देशात जे काही चुकीचं चाललंय, त्यासाठी मोदींना दोष देणं फार सोपं आहे. पण मोदी सत्तेत येण्याआधीही या देशात खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी होत्या हे वास्तव आहे. भारतात भिन्न धर्मीयांमध्ये छुप्या स्वरुपात नकारात्मक भावना होत्याच. मला लहानपणी मुस्लीम असल्याबाबत हेटाळणीचा सामना करावा लागला होता. मीही इतरांना त्यांच्या धर्मावरून चिडवायचो. मला वाटतं या प्रकारच्या भावना या देशात कायम छुप्या स्वरुपात होत्या. मोदींनी या सगळ्या गोष्टींचा फायदा घेण्यात हुशारी दाखवली”, असं नसिरुद्दीन शाह यावेळी म्हणाले.

“इथे पूर्वीपासून सारंकाही चांगलं असल्याचे केले जाणारे दावे चुकीचे”

“धर्मनिरपेक्षता किंवा समानतेचे जे काही उरले-सुरले अवशेष शिल्लक होते, ते उद्ध्वस्त करण्याची संधीच यामुळे उपलब्ध झाली. याआधी आपण सुखी आणि समृद्ध होतो, सगळं काही चांगलं होतं असे जे काही दावे केले जातात ते चुकीचे आहेत. तशी परिस्थिती नव्हती. हिंदू-मुस्लीम ऐक्याचं चित्र चित्रपटांमधून किंवा गाण्यांमधून उभं केलं जायचं. ते तसं व्हावं यासाठीचा तो एक प्रयत्न होता. पण मला वाटत नाही की देशानं त्याचा स्वीकार केला आहे. फक्त काहींनी स्वीकार केला. त्यामुळे ही गाणी म्हणजे फक्त शब्दच्छल होता”, असंही नसिरुद्दीन शाह यांनी नमूद केलं.

हे वाचले का?  Lateral entry ad cancel: वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भरती अखेर UPSC कडून रद्द; विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारचे घुमजाव

“मुस्लिमांचीही चूक”

दरम्यान, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतानाच नसिरुद्दीन शाह यांनी मुस्लिम समुदायाचीही चूक असल्याचं स्पष्ट केलं. “माझ्या सहा पिढ्या या देशात संपल्या, या देशानं मला प्रेम करायला शिकवलं. पण काही प्रसंगी मला हा देश काही वेगळाच वाटला”, असं ते म्हणाले.

“सत्य हे आहे की मुस्लिमांनीही कधी या गोष्टींची तक्रार केली नाही. मुस्लिमांनी आत्तापर्यंत सर्व चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं. शिक्षणाविषयी चिंता करण्यापेक्षा त्यांना हिजाब, सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीची चिंता आहे. त्यांनी शिक्षणाविषयी काळजी करायला हवी. त्यांनी मुलांना आधुनिक गोष्टींचं प्रशिक्षण द्यायला हवं. मदरशांमध्ये मुलांना ठेवून त्यांना कायम धार्मिक गोष्टींचं शिक्षण देण्यापेक्षा त्यांनी मुलांना आधुनिक शिक्षण द्यायला हवं. ही मुस्लिमांची चूक आहे”, असं भाष्य नसिरुद्दीन शाह यांनी यावेळी केलं.

हे वाचले का?  रतन टाटा यांच्या निधनामूळे वरसोली गावावर शोककळा; जाणून घ्या काय होते रतन टाटांचे अलिबाग मधील वरसोली कनेक्शन