सह्याद्री हजार कोटींची उलाढाल करणारी पहिली शेतकरी कंपनी, २०२२-२३ वर्षात ५० कोटींचा नफा

देशातील फलोत्पादनातील आघाडीच्या ‘सह्याद्री फार्म्स‘ने २०२२-२३ या आर्थिक वर्षात मागील वर्षीपेक्षा २८ टक्के अधिक व्यवसायवृध्दी करीत एक हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा पार केला.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक- देशातील फलोत्पादनातील आघाडीच्या ‘सह्याद्री फार्म्स‘ने २०२२-२३ या आर्थिक वर्षात मागील वर्षीपेक्षा २८ टक्के अधिक व्यवसायवृध्दी करीत एक हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा पार केला. हा टप्पा गाठणारी सह्याद्री देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी ठरली आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने १००७ कोटींची उलाढाल करीत ५०.२९ कोटींचा नफा मिळवला.

मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स ही द्राक्ष उत्पादन, निर्यात आणि टोमॅटो प्रक्रियेतील देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. कंपनीची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी ही माहिती दिली. कंपनीचे दोन हजार शेतकरी सभासद, संचालक व कर्मचारी उपस्थित होते. सह्याद्री फार्म्सने हे स्थान मागील सात वर्षांपासून टिकवून ठेवले आहे. व्यवसायात जागतिक दर्जाची प्रमाणके आणून जागतिक द्राक्ष बाजारात स्थान निर्माण केलेली फलोत्पादनातील ही महत्वाची भारतीय कंपनी म्हणून ओळखली जात आहे.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

याशिवाय डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, काजू, मका या पिकांसाठीही काम केले जात आहे. विविध पिकांतील सुमारे २४ हजारहून अधिक शेतकरी थेट कंपनीशी जोडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा दुपटीने वाढला. २०२१-२२ वर्षात कंपनीला २३.१४ लाख रुपये नफा झाला होता. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात तो ५०.२९ कोटींवर पोहोचला. ‘सह्याद्री फार्म्स’शी अन्य ४८ शेतकरी उत्पादक कंपन्या संलग्न आहेत. त्यांच्यामार्फत विविध फलोत्पादन तसेच प्रक्रिया प्रकल्पांवर काम सुरु आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या या कंपनीने ५५८ कोटींच्या पायाभूत सुविधा (मालमत्ता) उभारल्या आहेत. सुमारे १३०० पूर्णवेळ रोजगार आणि चार हजार हंगामी रोजगार यातून निर्माण झाला आहे.
कंपनीचे प्रमुख विलास शिंदे यांनी १२ वर्षांपासून ही वाटचाल सुरु असून ती एका महत्वाच्या टप्प्यावर आल्याचे नमूद केले. शेती क्षेत्रात एकत्र येत निश्चित दिशा ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्नांसह काम करायला वाव आहे. यातून ग्रामीण भागातील युवा शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

पावणेतीन लाख टन कृषिमालावर प्रक्रिया, निर्यात

सह्याद्री फार्म्सकडून २४.५ हजार शेतकऱ्यांच्या ४० हजार एकर क्षेत्रातून येणाऱ्या दोन लाख ७५ हजार ३२७ मेट्रिक टन उत्पादनावर प्रक्रिया व निर्यात केली गेली. निर्यातीतून सुमारे ३५२ कोटींचे उत्पन्न तर देशांतर्गत बाजारपेठेतून ६५५ कोटी उत्पन्न अशा प्रकारे एकूण १००७ कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला. यामध्ये ताज्या फळांच्या विक्रीचे प्रमाण ५३ टक्के तर प्रक्रियायुक्त उत्पादनांचे प्रमाण ४७ टक्के आहे.