२८ हजार गावांमध्ये लवकरच ‘बीएसएनएल’ची ‘४ जी’ सेवा, अडीच वर्षांत ‘५ जी’ सेवा

देशातील एकही मोबाईल कंपनीचे नेटवर्क नसलेल्या २८ हजार गावांत ‘बीएसएनएल’ वर्षभरात ४ जी सेवा उपलब्ध करेल, अशी माहिती ‘बीएसएनएल’चे (दिल्ली) संचालक (मानव संसाधन) अरविंद वडणेरकर यांनी दिली.

भारत संचार निगम लिमिटेडकडून (बीएसएनएल) येत्या वर्षभरात देशभरातील ग्राहकांना ४ जी, तर सुमारे अडीच वर्षांत ५ जी सेवा उपलब्ध होईल. सोबत देशातील एकही मोबाईल कंपनीचे नेटवर्क नसलेल्या २८ हजार गावांत ‘बीएसएनएल’ वर्षभरात ४ जी सेवा उपलब्ध करेल, अशी माहिती ‘बीएसएनएल’चे (दिल्ली) संचालक (मानव संसाधन) अरविंद वडणेरकर यांनी दिली.

नागपुरातील झिरो माईल्स येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत वडणेरकर म्हणाले, की देशातील काही आदिवासी पाडे, नक्षलग्रस्त, दुर्गम भागातील गावांसह काही मागास भागातील गावांमध्ये आजही एकही कंपनीचे मोबाईल नेटवर्क नाही. या गावातील नागरिकांना चांगल्या सेवा देण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेवरून ‘बीएलएनएल’ने काम सुरू केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील ४ हजार ९०० गावांसह देशातील २८ हजार गावांत ‘बीएसएनएल’ची ‘४ जी’ नेटवर्कची सेवा सुरू होईल.

हे वाचले का?  Narendra Modi : मोदींचं पोलंडमध्ये मराठीतून भाषण! कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन म्हणाले, “छत्रपती घराण्याने पोलिश महिला व मुलांसाठी…”

‘बीएसएनएल’ने ४ जी नेटवर्क सेवेसाठी संपूर्ण साहित्य, तंत्रज्ञान स्वदेशीच वापरले आहे. त्यामुळे ‘४ जी’ सेवा सुरू करायला विलंब झाला. परंतु, आता ‘अपग्रेड’ करण्याची सोय असल्याने ‘४ जी’ सेवा सुरू झाल्यावर त्यातून एक ते दीड वर्षांतच ‘५ जी’ सेवा सुरू करता येईल. ‘बीएसएनएल’कडे सध्या देशातील एकूण मोबाईल ग्राहकांपैकी १० टक्के ग्राहकांचा वाटा आहे. ‘४ जी’ नेटवर्क देशभरात सुरू झाल्यावर हा वाटा झटपट १५ टक्क्यांहून वर जाण्याची आशा आहे. त्यामुळे ‘बीएसएनएल’चे उत्पन्न केवळ मोबाईलमधून सुमारे २० ते २५ हजार कोटींपर्यंत जाण्याची आशा आहे.

हे वाचले का?  अन्यथा ‘लाडकी बहीण’ रद्द करू! सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा

‘बीएसएनएल’ला केंद्र सरकारकडून ग्रामीण व दुर्गम भागावत सामाजिक दायित्वातून सेवा देण्याच्या बदल्यात विविध पद्धतीने आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे ऑपरेशनल पद्धतीने बघितले तर ‘बीएसएनएल’ तोट्यात नाही. परंतु, २०२६-२७ पर्यंत चांगल्या नफ्यात येण्याची आशाही अरविंद वडणेरकर यांनी वर्तवली. पत्रकार परिषदेला बीएसएनएल महाराष्ट्र सर्कलचे मुख्य व्यवस्थापक रोहित शर्मा, कोर नेटवर्क (पश्चिम) मुख्य व्यवस्थापक प्रशांत पाटील, बीएसएनएल नागपूरचे महाव्यवस्थापक यश पान्हेकर उपस्थित होते.

….चौकट….

ग्रामीणला २०२३ पर्यंत ५ लाख जोडणी

‘बीएसएनएल’ला केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑप्टिकल केबल टाकण्यासह ३० हजार ग्राहकांना भ्रमणध्वनी जोडणीचे लक्ष्य दिले होते. डिसेंबरला ते १ लाखपर्यंत वाढवले गेले. हे दोन्ही लक्ष्य पूर्ण झाले असून जून २०२३ पर्यंत एकूण ५ लाख ग्रामीणच्या ग्राहकांना भ्रमणध्वनी जोडणीचे लक्ष्य आहे. तेही निश्चितच पूर्ण होण्याची आशा अरविंद वडणेरकर यांनी दिली. तसेच, नवीन स्वेच्छानिवृत्ती योजना आणली जाणार नसून नवीन भरतीही केली जाणार असल्याचे ते म्हणाले.