“छगन भुजबळ माझ्यासाठी शून्य माणूस, त्यांनी कधीही…,” सुहास कांदेंनी दिलं आव्हान

सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात महाविकास आघाडीत असतानाही सातत्याने संघर्ष झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांचा निकाल हाती आला आहे. यानिवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. तर, शिवसेना ( शिंदे गट ) आमदार सुहास कांदे यांचं वर्चस्व असलेल्या नांदगाव आणि मनमाड बाजार समितीचा निकाल अद्याप बाकी आहे. त्यातच आता सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

हे वाचले का?  नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पाच माजी आमदारांचं महाविकास आघाडी परिवर्तन पॅनल आणि सुहास कांदे यांचं श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनलमध्ये लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

त्यातच ‘एबीपी माझा’शी बोलताना सुहास कांदे यांनी छगन भुजबळांना आव्हान दिलं आहे. “छगन भुजबळांना मी पाडलं आहे. त्यामुळे त्यांना मनावर घेत नाही. भुजबळ माझ्यासाठी शून्य माणूस आहेत. त्यांनी कधीही माझ्यासमोर उभं राहावं,” असं सुहास कांदे यांनी म्हटलं.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

“मतदारांवर माझा विश्वास आहे. मतदार हे विकासाला मतदान करणारे आहेत. त्यामुळे माझा शेवटचा उमेदवार ५० मतांनी निवडून येईल. तर, पहिला उमेदवार २०० मतांच्या आघाडीनं निवडून येईल,” असा विश्वास सुहास कांदेंनी व्यक्त केला आहे.