मतदारसंघ आढावा : उस्मानाबाद (धाराशिव); ठाकरे गट वर्चस्व राखणार की महायुती आव्हान देणार ?

बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यामागे थांबणारा मतदार राजकीय फाटाफुटीनंतर कोणाला कौल देतो, याचे विश्लेषण अनेक अंगाने होत असताना धाराशिव लोकसभा मतदारसंघ सत्ताधारी भाजप लढविणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक रिंगणात उतरणार हे ठरलेले नाही.

सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येनंतर धाराशिव जिल्ह्याचे नेते पद्मसिंह पाटील यांच्या प्रस्थापित राजकारणाला छेद देत मतदारांनी पहिल्यांदा रवींद्र गायकवाड आणि नंतर ओम राजेनिंबाळकर यांना निवडून दिले. बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यामागे थांबणारा मतदार राजकीय फाटाफुटीनंतर कोणाला कौल देतो, याचे विश्लेषण अनेक अंगाने होत असताना धाराशिव लोकसभा मतदारसंघ सत्ताधारी भाजप लढविणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक रिंगणात उतरणार हे ठरलेले नाही. अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी तेरणा साखर कारखान्याच्या परिसरात सभा घेऊन या मतदारसंघावर ताबा सांगितला आहे. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत, प्रा. रवींद्र गायकवाड पुन्हा आपण सज्ज असल्याचे सांगू लागले आहेत. या निवडणुकीत धाराशिवचा लढा (शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) अशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे वाचले का?  महायुतीच्या जागावाटपाचा पेच सुटला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात एक तास चर्चा

स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे हात चिन्हावर जो कोणी उभा राहील, त्याला मतदान करायचे असे या मतदारसंघाचे प्रारुप शिवसेनेमुळे बदलले. तोपर्यंत फारसे मतदारसंघात न फिरकणाऱ्या अरविंद कांबळे यांना मतदार खासदार म्हणून निवडून द्यायचे. पुढे ते उदगीर मुक्कामी असत. पुढे शिवाजी कांबळे, कल्पना नरहिरे यांनी शिवसेनेचा किल्ला लढवला. काँग्रेस विरोधी मानसिकता भिनलेला जिल्हा अशीओळख निर्माण होईल, एवढे मतदारांनी बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम व्यक्त केले. त्याला स्थानिक नेत्यांची आरेरावी, कुटुंबामध्ये राजकीय पदे देण्याच्या वृतीमुळे शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात असला तरी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला कधी यश मिळाले नाही.

शिवसेनेला पोषक वातावरण असणारा जिल्हा. पण नव्या राजकीय फाटाफुटीनंतर कोणती शिवसेना वरचढ हे कळणार आहे. परंडा तालुक्यात भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून धाराशिवच्या राजकारणात उतरणारे तानाजी सावंत सध्या जिल्ह्यातील विविध पदांची राजकीय मांडामांड करत आहेत. अशा स्थितीमध्ये लाेकसभा निवडणुकीत भाजपला उतरायचे असेल तर राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशिवाय भाजपमध्ये फारसे तगडे उमेदार नाहीत, हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक भाजप नेत्यांची संख्या खूप. मूळ गाव मुरुम असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे हे गेली सहा महिने गावोगावी सभा घेत आहेत. लिंगायत मतांचा प्रभाव असल्याने पुढे जाता येईल, अशी मांडणी त्यांचे समर्थक करतात. पण याच गावातील काँग्रेसचे मोठे नेते बसवराज पाटील यांना भाजपमध्ये घेऊन नवी गणिते मांडता येतात का, याचीही चाचपणी भाजप नेते करत आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिंदेची शिवसेना की भाजप असा उमेदवारीचा डाव राजकीय पटावर अधिक चर्चेत आहे. यामध्ये राणा जगजीतसिंह पाटील यांनी राजकीय सत्ता चौकटीत आपण विकासकामांच्या माध्यमातूनच मतदारांसमोर जाऊ, अशी भूमिका स्वीकारलेली दिसून येते.

हे वाचले का?  नाशिकच्या जागेचे भवितव्य ठाण्यावर अवलंबून, तिढा कायम

शिवसेनेतील फाटाफुटीनंतर खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येनंतर ओम राजेनिंबाळकर हे राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विरोधातच उभे राहणार हे मतदारसंघात सर्वांना माहीत आहे. आमदार कैलास पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याची भूमिका घेतल्याने या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतही ‘गद्दार- खुद्दार’ असा मुद्दा चर्चेत ठेवला जाण्याची शक्यता आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ओम राजेनिंबाळकरांनी त्यांचा जनसंपर्क वाढवला. दूरध्वनीवर प्रतिसाद देणारा अशी त्यांची ओळख आहे. उद्धव ठाकरे गटाचे राज्यस्तरावर ठरलेल्या कार्यक्रमापेक्षाही जिल्ह्यातील समस्या आणि त्यातून निर्माण होणारा रोष याच्या एकत्रिकरणावर ओम राजेनिंबाळकर भर देत आहेत. त्यांचे हे प्रयत्न कमी आहेत हे दाखवून देण्यासाठी भाजप पुढे सरसावते की सत्ताधारी शिवसेना यावर बरीच गणिते बदलतील.

हे वाचले का?  नंदुरबारमध्ये राहुल गांधींसाठी विशेष होळी; १२ मार्चला न्याय यात्रेचे आगमन

मिळालेली मते

ओम राजेनिंबाळकर : ५,९६,६४०
राणा जगजीतसिंह पाटील : ४,६९,०७४