लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

देशातील ९० टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ उद्योगपतींना दिला आहे.अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

सोलापूर : देशातील ९० टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ उद्योगपतींना दिला आहे. परंतु देशातील जनता आता मोदींना पुरती ओळखली आहे. म्हणूनच मोदी घाबरले आहेत. लोकसभा निवडणूक त्यांच्या हातातून निसटत आहे. म्हणूनच ते पुन्हा पाकिस्तान, दोन समाजामधील द्वेषाची, खोटेपणाची भाषा वापरत आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सोलापुरात आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. दुपारी तळपत्या उन्हात लक्ष्मी मिल मैदानावर झालेल्या या सभेस हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात आदींची व्यासपीठावर उपस्थित होते.

हे वाचले का?  रोहित पवारांच्या कंपनीशी संबंधित ५० कोटींच्या मालमत्तांवर टाच, राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ची कारवाई

यंदाची लोकसभा निवडणूक केवळ जिंकण्याचे नव्हे तर संविधान बदलण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. आम्हांला संविधान आणि लोकशाही वाचवायची आहे. कोणी कितीही प्रयत्न करीत असले तरी संविधान बदलू शकत नाही, असे नमूद करीत राहुल गांधी यांनी, मोदी सरकारच्या मागील दहा वर्षांच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. देशातील २२-२५ धनाढ्य उद्योगपतींना मोदी सरकारने १६ लाख कोटींची कर्जे माफ केली आहेत. कर्जमाफीची एवढ्या मोठ्या रकमेतून मनरेगासाठी २४ वर्षे वापरता आला असता. एवढ्याच पैशातून देशातील शेतकऱ्यांना २४ वर्षे कर्जमाफी मिळाली असती.

७० कोटी जनतेजवळ जेवढा पैसा आहे, तेवढाच पैसा २२-२५ धनाढ्यांच्या तिजोरीत आहे. त्यामुळे देशात आर्थिक विषमता वाढली आहे. मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर, कामगार, तरूण सर्वांची निराशा झाली आहे. म्हणूनच देशातील आम जनता आज संविधान आणि लोकशाही वाचविण्याच्या बाजूने खंबीरपणे उभी आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

हे वाचले का?  मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव, उपोषणाचा पाचवा दिवस मात्र उपचार घेण्यास नकार

देशातील प्रसार माध्यमे मोदींच्या दबावाखाली असून ही ‘गोदी मिडिया’ शेतकरी, कामगार, गोरगरीब, दलित, आदिवासींच्या दररोजच्या जगण्याच्या प्रश्नांवर चर्चा करीत नाही. माध्यमांमध्ये सूत्रसंचालन करणा-यांमध्ये देशातील ९० टक्के मागासवर्गीय, आदिवासी, शेतक-यांचे प्रतिनिधित्व करणारा एकही दिसत नाही.

दोनशे मोठ्या कंपन्यांमध्ये मराठा,धनगर व इतर बहुसंख्य बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व दिसत नाही. देशातील ७० टक्के जनतेकडून जीएसटीच्या माध्यमातून वसूल झालेला पैसा मूठभरांच्या फायद्यासाठी वापरला जातो. पारदर्शकतेचा अभाव असलेल्या निवडणूक रोख्यांमधून झालेला भ्रष्टाचार भयानक आहे, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधून जनसमुदायावर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून गारूड केले. मोदी यांनी देशाला अन्यायाची राजधानी बनविली आहे, असा आरोप त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने महिला, तरूण, शेतकरी, कामगार आदी सर्व घटकांसाठी दिलेल्या कल्याणकारी योजनांचा पुनरूच्चार केला.

हे वाचले का?  “अजित पवारांच्या उर्मटपणाला लोक वैतागले आहेत, बारामतीत सुप्रिया सुळे..”, विजय शिवतारेंचं वक्तव्य

वंचितचा उमेदवार काँग्रेसमध्ये

सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून भरलेली उमेदवारी परस्पर मागे घेतलेले राहुल गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या सभेचे औचित्य साधून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गायकवाड यांना पक्ष प्रवेश देऊन त्यांचे स्वागत केले.